राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा बहाल केली असून ही अतिशय आनंदाची बाब आहे यामुळे सदर विद्यार्थ्यांचे शिक्षण आता पुन्हा व्यवस्थित होऊ शकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत व्यक्त केला आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजना राबविण्यात येते. यामध्ये परदेशातील विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण फी, आरोग्य विमा व व्हिसा शुल्क मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परंतु अनेकदा नवे वातावरण व अन्य काही कारणांमुळे मुलांना एटीकेटी मिळते. यानंतर त्यांची शिष्यवृत्ती थांबविली जाते.या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. त्यामुळे त्यांना तेथे मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत शिवाय सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
Web Title: MP Supriya Sule’s follow-up success; Govt reinstates scholarship to foreign ATKT holders
खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान १४ निष्पाप अनुयायांचामृत्यू झाला. सुरुवातीला उष्माघाताने १४ अनुयायांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यानंतर समाजमाध्यमातून वेगवेगळी माहिती उघडकीस येत आहे. या सोहळ्यात चेंगराचेंगरी झाली व त्यात अनुयायांचा मृत्यू झाला. अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. अनुयायी सात तास पाण्याशिवाय व खाण्याशिवाय उन्हात होते. गर्दीचे नियोजन न केल्यामुळे रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोचण्यास विलंब झाला. राज्यात उष्णतेची लाट असताना उघड्यावर उन्हात कार्यक्रम घेण्यात आला. असा भव्य कार्यक्रम करण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीला काम देण्यात आले. या कार्यक्रमात जाहीर करण्यात आलेल्या मृतांच्या आकडेवारीपेक्षा जास्त मृत्यू झाला आहे. अशा अनेक बाबी टप्प्याटप्प्याने उघडकीस येत आहेत. या सर्व बाबींची शहानिशा करून सत्य जनतेसमोर येणे आवश्यक आहे असेही अजित पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
या कार्यक्रमाला तब्बल १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. उष्णतेची लाट लक्षात घेता सर्व शक्यतांची पडताळणी सरकारकडून होण्याची आवश्यकता होती. तथापि ती न झाल्याने १४ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना नैसर्गिक नसून शासननिर्मित आहे. सदोष नियोजनामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेला आणि मृत्यूला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. त्यामुळेच तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. कार्यक्रम आयोजनाबाबत घेतलेला निर्णय, आयोजनातील त्रुटी आणि ही दुर्दैवी घटना याची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात यावी आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. अनुयायांवर मोफत उपचार करून त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करावी. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे मात्र एकाही मागणीबाबत सरकार सकारात्मक दिसत नाही अशी नाराजीही अजित पवार यांनी पत्रात नमूद केली आहे.
दरम्यान सरकारचे प्रमुख म्हणून या मागण्या मान्य करण्याबाबत सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंतीही अजित पवार यांनी पत्रात केली आहे.
Web Title: Kharghar Heatstroke Tragedy | Retired judge to inquire into unfortunate incident at ‘Maharashtra Bhushan’ award ceremony – Ajit Pawar
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
आजची मविआची दुसरी सभा. आजची सभा उपराजधानीत. मागे कस्तुरचंद पार्कला सभा घेतली तेव्हा शेतकऱ्यांच्यी कर्जमुक्ती करण्याचा निश्चय केला. धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात आला पण घराणेशाहीचा विरोध करणाऱ्या घेण्याचा सत्कार करावा लागला. ते मोठे घराणे आहे. त्यांचे व्यसनमुक्तीचे मोठे काम. सत्तेची नशा देश नासवते. आपल्या देशात लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांसाठी आणि मतदार बनवण्यासाठी. यांच्या मित्राचा क्रम मात्र श्रीमंतीत वाढतोय आणि देशाचा सगळ्या बाबतीत खालवतोय. ह्या भूमीत बाबासाहेबांनी माणसाला ओळख निर्माण करून दिली. आता भारत मातेच्या पायात बेड्या घालण्याचे काम सुरू. बाबासाहेबांनी आयुष्य दिल घटना दिली उपस्थित त्यांच्या घटनेचे रक्षण मीच करणार ही आपण सगळ्यांनी निश्चय करण्याची गरज.
आठ दहा दिवस अगोदर फडतुस शब्द निघाला पण त्यामागचा उद्देश काय होता. हे उलट्या पायाचे सरकार आल्यावर अवकाळी, गारपीट होतेय. आमचे डोळे वेळेत उघडले. आम्ही आधी काम करुन दाखवले मग सभा घेतोय. गद्दारी करुन सरकार पाडले ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आम्ही वार झेलू तो छातीवर आणि करु तोपण छातीवर.
विदर्भावर अन्याय झाले म्हणून बोंबलतात. बेलोरा गावचे शेतकरी त्यांच्या नुकसानीचा उल्लेख. मी अयोध्येला गेलो तेव्हा सुनील केदार पण सोबत होते. शिवसेनेने पहिले मंदिर फिर सरकार हा नारा दिला. आम्ही कायदा करा म्हणालो पण मोदींनी धाडस केले नाही. आता कोर्टाने निकाल दिल्यावर श्रेय घेताहेत. मुख्यमंत्री खरच राम भक्त असते तर सुरत गुवाहटी न जाता अयोध्येला गेले असते. फडणवीस कधी अयोध्येला गेले होते का? नाही हे गेले म्हणून फडणवीस गेले. इकडे अवकाळी पण राम राज्य महाराष्ट्रात, देशात कधी येणार? शेतकरी रडतोय मग मागून मुख्यमंत्री जाऊन बोलतात. आम्ही वेळीच मदत केली होती.
घरातबसून कारभार करत असूनही तुमच्या मदतीने केले आणि पहिल्या पाचात महाराष्ट्र होता. जनतेला काय हव ? नागपूरला एअर बस प्रकल्प मविआ विदर्भात आणणार होतो पण तो यांनी गुजरातला हलवला आणि हे आमच्यावर आरोप करतात. ८-९ वर्ष मोदींनी काय केले? बाप चोरणारी ही अवलाद न यांचे कुणी दैवत ना आदर्श. चंद्रकांत पाटील गेले होते का अयोध्येला? संघाला चंद्रकांत पाटलांचे म्हणणे पटतय का? शिवसेनाप्रमुखांचा अपमान तुम्ही करता. मी आव्हान देतो या मैदानात, मैदान मिळू नये म्हणून काड्या कसल्या करता. जनता जो निर्णय घेईल तो विनम्र पणे स्वीकारेल.
काँग्रेस मध्ये हिंदू नाहीत? आमच हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही. यांचे हिंदुत्व हे गोमूत्रधारी आहे. संभाजीनगरच्या सभे नंतर यांनी गोमूत्र शिंपडले. तिथे आलेली लोक काय माणसे नव्हती? मोहन भागवत मशिदीत गेले मी गेलो असतो तर? हिंदुत्वाच्या भाकड कथा मला सांगू नका या देशासाठी त्याग करणारा हिंदू.
२०१४ साली यांनी वचन मोडले. असले हिंदुत्व आमचे नाही. एका महिलेला जाऊन मारहाण केली मातृत्वासाठी उपचार करत होती तिच्या पोटात लाथा घातल्या. तिची तक्रार घ्यायला पोलीस तयार नाही. हे यांचे हिंदुत्व हे असे असेल तर मग गृहमंत्री फडतुस हा शब्द वापरला. फडतुस म्हणजे बिनकामाचा. देश मोकळा असायला हवा. क्रांतीकारक जे देशासाठी लढले ते भाजपला सत्तेवर बसवण्यासाठी नाही तर जनतेसाठी लढले. अन्याय करणाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही हे तुम्हाला ठरवायचे आहे. हे नाहीतर कोणीही येईल पण ते नको.
हिडेनबर्ग चला फालतु असेल मग इतके का हादरलात? राहुल गांधीजींना अपात्र ठरवले. सत्यपाल मलिक तर भाजपचे त्यांनी केलेल्या गौफ्यस्फोट मानणार की नाही त्यांनी भयंकर गोष्टी सांगितल्या. वाजपेयजी म्हणायचे सरकारे येतील जातील पण देश असायला हवा. सगळे गद्दारांना घेऊन कारभार सुरु आहे ही सत्तेची नशा. गेल्या ८/९ वर्षात देशासाठी काय केले ते अगोदर सांगा.
उज्वला योजना किती ठिकाणी योग्य सुरु आहे? पीकविमा योजना, शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे येतायत? कुणाच्याही गावात लाभ नाहीत पण यांचे फोटो सगळीकडे दिसतायत योजना दिसत नाही. मोदींच्या अगोदर गँस सिलेंडर, डाॅलरचा भाव कुणाला आठवतात. आता आनंदाचा शिधा त्यातल्या कडधान्याला बुर्शी लागलीय. आता जिंकेपर्यंत थांबायचे नाही. मोदींना अडचणीचे मुद्दे आले की मग धार्मिक मुद्दे अचानक समोर येतात. यांच्या बुरख्याआड जो भेसूर चेहरा आहे तो जनतेने ओळखावा. तुम्ही मुठी आवळून सांगा अखेर पर्यंत सोबत आहात ( प्रचंड प्रतिसाद) पत्रकारांनी पण बघावे हे सगळे सभेला आलेले भाड्याचे लोक नाहीत विश्वास ठेऊन आले आहेत. आता जिंकेपर्यंत लढायचे.
जय हिंद जय महाराष्ट्र!
Web Title: Shiv Sena (UBT) Chief Uddha Thackeray’s Speech at MVA’s “Vajramooth” Sabha at Nagpur
पुणे येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री गिरीश बापट यांचे बुधवार, २९ मार्च रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी पहाटे प्रकृती खालावल्याने बापट यांना पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बापट हे काही महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांना गेल्या काही महिन्यांपासून श्वासोच्छवासाचा त्रास होत होता, त्यांच्यावर रुग्णालयात डायलिसिस सुरू होते.
नुकत्याच झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. व्हीलचेअरवर बसून मतदान करण्यासाठी त्यांनी मतदान केंद्राला भेट दिली होती. बापट यांनी कसबा पेठ मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून काम पाहिले होते. २०१९ मध्ये ते पुण्याचे खासदार झाले.
Web Title: Veteran BJP leader and MP Girish Bapat passed away
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. यावर्षी सप्टेबर महिन्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. हे अमृत महोत्सवी वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले तरी सरकार या अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात गंभीर नाही. मराठवाडा आणि मराठवाड्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाविषयी सरकारची अनास्था आहे, त्यांना यावषयी काही देणे-घेणे दिसत नाही. हे अमृतमहोत्सवी वर्षे साजरे करण्याविषयी सरकारकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत, तरी सरकारने या विषयी आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा हा सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. सप्टेंबर महिन्यात या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात झाली. आता हे वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची मागणी आम्ही सर्वांनी केली होती. याविषयी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सुध्दा हा विषय मी मांडला होता. मात्र अजूनही सरकारकडून या विषयी कोणत्याही हालचाली सुरु नाहीत. मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा करण्याविषयी साधा प्रस्तावसुध्दा सरकारच्यावतीने सभागृहात आणला नाही. सरकार यानिमित्त काय कार्यक्रम साजरे करणार आहे ? त्याचे नियोजन काय ? हे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले नाही याबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
Web Title: Oppn leader Ajit Pawar lashed out at Maharashtra govt over government’s indifference to celebrate 75th anniversary year of Marathwada Liberation
महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी गेल्यावर्षी विविध खेळात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर लक्षवेधी कामगिरी केली आहे. या खेळाडूंना रोख रकमेची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली होती. मात्र या घोषणेला सहा महिने उलटून गेले तरी विजेत्या खेळाडूंना ना घोषीत करण्यात आलेली रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव करण्यात आला. राज्यसरकार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या खेळाडूंची अवहेलना करत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
दरम्यान या विजेत्या खेळाडूंना घोषित केलेली रक्कम तसेच त्यांचा उचित गौरव करण्याची मागणीही अजित पवार यांनी सभागृहात केली.
महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी गेल्यावर्षी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर विविध खेळात चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात विविध खेळाडूंनी २८६ पदकांची लयलूट केली आहे. तसेच यावर्षीच्या खेलो इंडिया स्पर्धेत सुध्दा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत देशात सर्वाधिक पदके पटकावली आहेत. गेल्या वर्षभरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर चकमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना रोख रक्कम देण्याची घोषणा राज्यसरकारने केली होती याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.
Web Title: Oppn Leader Ajit Pawar’s Allegation of Government’s Ignorance of Maharashtra’s Athletes Who Have Performed Remarkably at National and International Levels
नवी मुंबई विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्ताला सिडकोकडून मिळणारा मोबदला निश्चित करण्यासाठी लाच मागणाऱ्या सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने नुकतीच कारवाई केली आहे. ही वस्तुस्थिती असताना सिडको तर्फे प्रकल्पग्रस्त शेतक-यांस केलेल्या भूखंडांचे वाटप आणि प्रतीक्षा यादी अद्ययावत नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीमुळे समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सिडकोकडे अर्ज केला होता. या अर्जात अनिल गलगली यांनी सिडको अंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकरी यांस देण्यात आलेल्या भूखंडांची माहिती आणि आणि प्रतीक्षा यादीची मागितली होती. सिडकोचे सहाय्यक विकास अधिकारी श्रीकांत पावसकर यांनी अनिल गलगली यांस कळविले की माहिती अधिकार अधिनियमान्वये वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करुन देणे अभिप्रेत आहे. या विभागात १२.५ टक्के योजनेतंर्गत वाटप करण्यात येणा-या भूखंडाची माहिती गावं निहाय संचिका क्रमांक नुसार ठेवण्यात आलेली आहे. संचिका क्रमांक आणि गाव याबाबत माहिती देत संचिका तपासणी करावी.
अनिल गलगली यांच्या मते नवी मुंबई विमानतळाचे काम झपाट्याने सुरु असून प्रकल्प बाधितांना सिडकोकडून भूखंड स्वरूपात मोबदला देण्याचे देखील काम सुरु आहे. त्यामध्ये प्रकल्पग्रस्ताला संपादित घराच्या किंवा जमिनीच्या बदल्यात मिळणाऱ्या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी आर्थिक व्यवहार केला जात आहे. माहिती अद्ययावत असल्यास सिडको अधिकारी यांस दिरंगाई का होते याचे उत्तर द्यावे लागेल. यामुळे सदर माहिती अद्ययावत नाही. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सिडकोचे उपाध्यक्ष यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की वाटप आणि प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी.
Web Title: Allotment of plots to project affected farmers and waiting list is not updated with CIDCO
भारताच्या जी-२० अध्यक्षतेअंतर्गत तीन दिवसीय सिव्हिल-२० इंडिया २०२३ इनसेप्शन कॉन्फरन्स सोमवारपासून महाराष्ट्रातील नागपुरात होणार आहे. या परिषदेसाठी जी-२० देशांतील नागरी समाजाचे प्रतिनिधी रविवारी नागपुरात दाखल झाले.
नागपूर विमानतळावर महाराष्ट्रीयन परंपरेने प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. संमेलनासाठी नागपूर शहर सजावटीच्या दिव्यांनी सजले आहे.
या परिषदेत जी-२० देश आणि इतर देशांतील नागरी समाजाचे सुमारे २५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
सी-२० भारत हा जी-२० चा एक अधिकृत प्रतिबद्धता गट आहे जो जगभरातील नागरी समाज संस्थांना जी-२० मधील जागतिक नेत्यांसमोर लोकांच्या आकांक्षा ठळक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो.
जी-२० मध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन या देशांचा आणि राष्ट्रसमूहांचा समावेश आहे.
Web Title: C-20 India Conference starts from today in Nagpur
राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य करण्यात आल्याचे सांगतानाच संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधीमंडळातील मुख्यमंत्री समिती कक्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाचे उपाध्यक्ष विश्वास काटकर यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघ, शिक्षक भारती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद युनियन, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना, माध्यमिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जुनी पेन्शन संघटना, महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, राज्याच्या विकासात कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीच्या मागे जे तत्व आहे त्या विरोधात सरकार नाही. यातून मार्ग काढण्याची मानसिकता सरकारची आहे. अधिकारी-कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांची सामाजिक सुरक्षा जोपासण्यासाठी चर्चेतून मार्ग काढला जाईल. यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांची समिती नेमली जाईल. ही समिती कालबद्धरित्या अहवाल सादर करेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ज्या राज्यांनी ही जुनी निवृत्ती योजना लागू केली आहे, त्याबाबत त्यांचा रोडमॅप अद्यापही तयार नाही. या योजनेबाबत राज्य शासन जे धोरण स्वीकारेल त्यात याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होवू देणार नाही. राज्य शासन कोणतीही अडेल भूमिका घेणार नाही आणि कर्मचाऱ्यांनीही घेवू नये, असे सांगत कर्मचारी संघटनांनी चर्चेत मार्ग काढण्यासाठी सहकार्य देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाचे उपाध्यक्ष विश्वास काटकर यांनी संपाबाबत आणि जुन्या निवृत्ती योजनेबाबत मुद्दे मांडले.
Web Title: Committee to be appointed to study ‘Old Pension Scheme’; Meeting of CM, Dy CM regarding strike
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे योगदान मोठे आहे. खेड (जि. पुणे) येथे हुतात्मा राजगुरु यांच्या असलेल्या जन्मस्थळाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्मारकाला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतीकारकांनी बलिदान दिले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे बलिदान तर खूप मोठे आहे. नवीन पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे मूळगाव असणाऱ्या खेड (जि. पुणे) येथे त्यांच्या जन्मस्थळाला स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र हे स्मारक दुर्लक्षित झाले आहे. या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचे अधिकार केंद्रसरकारला आहेत. तरी राज्यसरकारने पाठपुरावा करुन हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याची मागणी अजित पवार यांनी केली.
Web Title: LoP Ajit Pawar demands to give National Protected Monument status to Martyr Rajguru Memorial at Khed