मुंबई : भारतीयांच्या हेरगिरीसाठी केंद्रातील मोदी सरकार इस्रायली तंत्रज्ञानाची मदत घेतली. असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भारतातले अनेक विचारवंत, शिक्षण तज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते, आणि पत्रकार यांच्या फोनमधले व्हाट्सअप मेसेज मे 2019 पर्यंत, त्यांच्या नकळत वाचले जात होते, असा खळबळजनक दावा, व्हाट्सअपने इस्रायलच्या एन एस ओ समूहावर कॅलिफोर्नियात दाखल केलेल्या खटल्यामध्ये करण्यात आला आहे. यामध्ये मोदी सरकार भारतीयांवर पाळत ठेवण्यासाठी इस्रायली तंत्रज्ञानाची मदत घेत असल्याचा गंभीर आरोप आमदार आव्हाड यांनी केला आहे.
फेसबुकवर पोस्टवर काय म्हटले आव्हाड…
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरू केला आहे. भारतातले अनेक विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवली जात आहे. हे पाळत ठेवण्याचे काम इस्रायलच्या एनएसओ समूहाने भारत सरकारच्या परवानगीनेच सुरू केले आहे. त्यामुळे सरकारनेच भारतीयांच्या खासगी जीवनात डोकावण्यास सुरुवात केली आहे. संविधानाने दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य नष्ट करण्याचा डाव या पाताळयंत्री हुकूमशाहीने रचला आहे. ही हेरगिरी आम्ही खपवून घेणार नाही, त्याविरोधात लढा उभारू, असा इशारा आमदार आव्हाड यांनी दिला.