अहमदाबाद: – गोध्रा हत्याकांडप्रकरणी (२००२) गुजरात हायकोर्टानं ११ दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. या निर्णयानंतर या प्रकरणात कुणालाही फाशीची शिक्षा मिळालेली नाही. एसआयटी विशेष कोर्टानं या ११ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती तर २० जणांना जन्मठेवीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात गुजरात हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली.
साबरमती एक्स्प्रेसच्या ‘एस-६’ डब्याला २७ फेब्रुवारी २००२ला गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या डब्यात ५९ प्रवासी होते व त्यातील बहुतांश अयोध्याहून परतणारे कारसेवक होते. याप्रकरणी एसआयटी कोर्टाने ३१ जणांना दोषी ठरवलं होतं तर ६३ जणांची निर्दोष सुटका केली होती. या प्रकरणी ११ दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा तर २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती.