पुणे : महाविद्यालयांप्रमाणे शाळांच्या गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यापुढे ज्या शाळा गुणवत्ता राखण्यात अपयशी ठरतील त्या बंद केल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी केली. राज्य शासनापाठोपाठ केंद्रानेही गुणवत्तेच्या आधारावर शाळा बंद करणार आहे. त्यामुळे राज्यापाठोपाठ देशभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
आठव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य शासनाने नुकतेच खालावलेली गुणवत्ता व पटसंख्येचे कारण पुढे करून नुकत्याच १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याला राज्यभरातून विरोध होत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्राने महाराष्ट्राचा हाच फॉर्म्युला देशभर वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविद्यालयाचे दर ५ वर्षांनी मूल्यांकन करून त्यांची गुणवत्ता तपासली जाते. त्यानुसारच आता शाळांचेही मूल्यांकन केले जाणार आहे. शाळांच्या गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.