नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह इतरांवर केलेल्या पाकिस्तान सोबत गुप्त बैठकीच्या आरोपांचे पडसाद आज राज्यसभेत देखील पाहयला मिळाले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या आरोपांचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या माफीची मागणी केली आहे.
आझाद यांनी यावेळी बोलताना देशाच्या माजी पंतप्रधानांसह इतर महत्त्वाच्या व्यक्तींवर केलेले हे आरोप सर्वसाधारण नसून गंभीर असल्याचे स्पष्ट केले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी यावर आपले म्हणणे मांडण्याची मागणी केली. यावर झालेल्या गदारोळानंतर संसदेचे कामकाज आज दुपारी २:३० वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. या अगोदर काँग्रेसने दोन्ही सभागृहांमध्ये नोटीस देत पंतप्रधानांच्या माफीची मागणी केलेली आहे.
या अगोदर विरोधी पक्षाने शरद यादव व अली अन्वर यांच्या सदस्यता रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी विरोधी पक्षाने हुकुमशाही चालणार नाही, अशा घोषणा देखील दिल्या. आज सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसने गुजरात निवडणुकीत सत्तेचा गैरवापर, अधिवेशन घेण्यास केलेला उशीर, वस्तू व सेवा कर, नोटबंदी, राफेल आणि शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केल्याचे दिसत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी संसदेत सकारात्मक चर्चा व्हावी असे मत व्यक्त केले होते. तसेच दूरगामी परिणाम करणारी विधेयके संसदेत सादर होणार असल्याचेही सांगितले होते.