नवी दिल्ली – पाकिस्तानने सीमेवरील दहशतवाद आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबवल्याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका होणार नाही असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. त्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सल्ला समितीच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर आणि परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे देखील उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना स्वराज यांनी सांगितले की त्या पाकिस्तानचे भारतातील राजदूतांना भेटल्या असून त्यांनी दोन्ही देशांमधील ७० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे तसेच मानसिक आरोग्य खराब असलेल्या व्यक्तींना मानवतावादी दृष्टीकोनातून सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. याबाबत बैठकीत उपस्थित असलेल्या एका सदस्याने माहिती दिली. दहशतवाद आणि क्रिकेट हातात हात घालून चालू शकत नाही असेही यावेळी स्वराज यांनी स्पष्ट केले.
मालदीव-चीन मुक्त व्यापार करार, या दोन्ही देशांमधील नजीकच्या काळातील वाढता संबंध आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याचे संबंधित सदस्याने सांगितले. मंत्रालयाने यासंदर्भात उत्तर देताना म्हटले आहे की भारत आणि मालदीवमधील संबंध जवळचे आणि सौहार्दपूर्ण आहेत. तसेच दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य वाढत आहे.