लखनौ | उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार सत्तेत आल्यापासून गुंड आणि सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या १० महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये ९२१ चकमकी झाल्या असून यात जवळपास दोन हजारहून अधिक गुन्हेगारांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या चकमकीमध्ये ३१ गुंडांना ठार मारण्यात आले.
उत्तर प्रदेशमध्ये नववर्षाच्या सुरुवातीपासूनच पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात मोहीम सुरु केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये १ ते १० जानेवारीपर्यंत १३ एन्काऊंटर झाले आहेत. यात ३ गुंडांना कंठस्नान घालण्यात आले. तर १५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या चकमकींमध्ये पोलीस दलातील अंकित तोमर या जवानासह ४ जणांना जीव गमवावा लागला. तर आठ पोलीस जखमी झाले.
संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (यूपीकोका) हा कायदाही आणला असून यात अंडरवर्ल्डमधील टोळ्यांसह सक्तीची वसुली, जमीन किंवा घरावर कब्जा करणे, वेश्या व्यवसाय, अपहरण, खंडणी, तस्करी या कलमांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या १० महिन्यांत पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये ९०८ वेळा चकमक झाली. यात ३५८ चकमकी या मेरठ जिल्ह्यात झाल्या. तर आग्रा येथे १७५ चकमकी झाल्या. या १० महिन्यांमध्ये ३१ गुन्हेगारांचा खात्मा करण्यात आला.