अहमदाबाद – आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता बदलासाठी तयार असल्याचे मत दलित कार्यकर्ते जिग्नेश मेवानी यांनी व्यक्त केले आहे. गुजरातमध्ये १५० जागा मिळणार असल्याचा भाजपने वारंवार दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात ९९ जागांपर्यंतच भाजपला मजल मारता आली. जनतेच्या या कौलावर जिग्नेश मेवानी यांनी हे भाष्य केले आहे. जिग्नेश हे गुजरातच्या वडगाम मतदारसंघातून अपक्ष निवडून आले आहेत.
‘देश बदलासाठी तयार आहे. त्यामुळेच १५० जागा मिळवण्याचे लक्ष भाजपला गाठता आले नाही. देश बदलासाठी तयार असल्याची ही नांदी आहे’ या आशयाचे ट्विट मेवाणी यांनी केले आहे. देश आर्थिक बदलांसाठी तयार असल्याचे सोमवारी पंतप्रधान मोदी म्हणाले होते. या पार्श्वभुमीवर मेवाणी यांनी देश बदलासाठी तयार असल्याचे ट्विट केले आहे.
दरम्यान मोदींना चिमटा काढत स्वगृही वडनगरमध्ये झालेल्या भाजपच्या पराभवाचाही समाचार मेवाणी यांनी फेसबुक पोस्टद्वारे घेतला आहे. ‘वडगामच्या जनतेने त्यांचा कौल कुणाला आहे हे मोदींना स्पष्ट केले आहे. येत्या शनिवारी वडगाव ते वडनगर या ५० किलोमीटरच्या ‘रोड शो’चे आयोजन करणार आहोत’ अशी माहिती मेवाणी यांनी दिली आहे.