अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या ७ व्या दिवशी सरकारने गंभीर दखल घेतली नाही. दुसरीकडे अण्णांची प्रकृती ढासळत आहेत. अण्णांचे सहा किलो वजन कमी झाले आहेत. सरकारने दखल न घेतल्यामुळे अण्णा समर्थकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अहमदनगरमध्ये माळीवाडा बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
प्रवाशांची गैरसोय लक्षात घेवून आंदोलकांनी १० मिनिटात रास्ता रोको मागे घेतला. परंतू आज संध्याकाळपर्यंत अण्णांचे उपोषण न सुटल्यास खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर रात्री जागरण गोंधळ घालण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित कुलकर्णी यांनी नगर भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांच्या असंवेदनशील भूमिकेचा समाचार घेतला. उद्योजक किशोर मुनोत म्हणाले, काँग्रेस सरकारनंतर मोठ्या अपेक्षेने जनतेने मोदी सरकारला निवडून दिले. परंतु जनलोकपालसह शेतकऱ्यांसाठी निवडणूक जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने ४ वर्षे झाली तरी पाळलेली नाही. ही जनतेची फसवणूक आहे. मोदींनी आता ‘मनकी बात’ बंद करून ‘काम की बात’ करावी, असा उपरोधक सल्लाही मुनोत यांनी दिला.
खासदाराच्या घरासमोर जागर गोंधळजागर…
खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर जागर गोंधळ घालण्याचा इशारा अण्णा समर्थकांनी दिला. सरकारने गंभीर दखल घेतली नाही तर अण्णा समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे. सरकार जो पर्यंत ठोस पाऊले उचलत नाही तो पर्यंत माघार नाही अशी भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली आहे.