मागील २४ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये एकाही व्यक्तीला जीव गमवावा लागलेला नाही, हे आमच्यासाठी एकप्रकारे यश आहे, असे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यापाल मलिक यांनी म्हटले आहे. श्रीनगरमधील पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. तसेच, आमचे मुख्य लक्ष्य जम्मू-काश्मीरमधील कायदा व सुव्यवस्थेवर आहे व यात आम्ही यशस्वी झालो असल्याचेही ते म्हणाले.
राज्यपाल मलिक यांनी सांगितले की, आमच्यासाठी प्रत्येक काश्मीरी नागरिकाचा जीव महत्वाचा आहे. आम्हाला एकाचाही जीव जाऊ नये असे वाटते, एकाही नागरिकाचा जीव गेलेला नाही. काहीजण जे हिंसक होऊ इच्छित होते ते जखमी झाले आहेत व त्यांना देखील कमरेखालीच मार लागलेला आहे.
तर यावेळी त्यांनी राज्यातील युवकांसाठी एक महत्त्वाची माहिती देत सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या प्रशासकीय सेवांमध्ये ५० हजार नोकऱ्यांची घोषणा केली जात आहे. तरी राज्यभरातील युवकांनी या नोकऱ्यांसाठी कसोशीने प्रयत्न करावेत. आगामी दोन ते तीन महिन्यात याबाबतच्या नियुक्त्या देखील केल्या जातील असेही ते म्हणाले.
इंटरनेट व मोबाइल सेवेबाबत बोलताना राज्यपाल मलिक म्हणाले की, फोन आणि इंटरनेटच्या वापरावर आम्ही मर्यादा आणल्या होत्या, कारण दहशतवादी आणि पाकिस्तान याचा येथील लोकांच्या भावना भडकवण्यासाठी व अफवा पसरवण्यासाठी मोठ्याप्रमाणात वापर करून घेत होते. त्यांच्यासाठी हे मोठे हत्यारच बनले होते, ज्याचा वापर ते आपल्याविरूद्ध करत होते. यामुळेच आम्ही या सेवा बंद केल्या होत्या. यावेळी या सेवा हळूहळू सुरू केल्या जातील असेही ते म्हणाले. कुपवाडा आणि हंदवाडात मोबाइल सेवा सुरू करणार असल्याचे सांगत, लवकरच अन्य जिल्ह्यांमध्येही मोबाइल फोन कनेक्टिविटी सुरू केली जाईल, अशी त्यांना माहिती दिली.