नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाने घेतला. त्यानंतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. यावर हिंदू महासभेने आक्षेप घेतला.
खटल्यातील पक्षकारालाच पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. ते पाहता अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पुनर्विचार याचिका दाखल करू शकत नाही, असे हिंदू महासभेच्या वतीने सांगण्यात आले. बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादात सुन्नी वक्फ बोर्ड पक्षकार आहे. त्यामुळे पुनर्विचार याचिका दाखल करायची असेल तो सर्वस्वी निर्णय सुन्नी वक्फ बोर्डाचा असायला हवा, असेही हिंदू महसभेचे वकील वरुण सिन्हा यांनी नमूद केले.
सुप्रीम कोर्टाने सर्व बाबींची पडताळणी करून निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मुस्लिम पक्षकाराला आपला हक्क सिद्ध करता आलेला नाही. त्यामुळे निकालात त्रुटी आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असेही सिन्हा यांनी पुढे नमूद केले.