मध्यप्रदेश: दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट झाल्याप्रकरणी दलित संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली असून मध्य प्रदेशमधील मुरैना येथे या बंदला हिंसक वळण लागले. मुरैनात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुरैनासह ग्वाल्हेर तसेच सागर जिल्ह्यात कलम १४४ लागू (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे.
दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट झाल्याप्रकरणी दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. राष्ट्रीय दलित मंचाचे नेते आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी ट्विटरवरुन बंदचे आवाहन केले. यानंतर देशभरातील दलित संघटना सोमवारी रस्त्यावर उतरल्या आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये दलित संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर व रेल्वे रुळांवर उतरले.
मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या गोळीबारात एकाचा तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच जमाव आणखी आक्रमक झाला. शेवटी पोलिसांनी मुरैनात कलम १४४ लागू केला. यानुसार परिसरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले. तर सागर व ग्वाल्हेर या भागातही जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या घटनेनंतर परिसरात पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्येही जमावाने चार बसेस जाळल्या.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शांततेचे आवाहन केले असून अॅट्रॉसिटीबाबत केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली आहे. दलित संघटनांनी व राजकीय पक्षांनी शांततेत आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
#WATCH #BharatBandh over SC/ST protection act:Shots fired during protests in Madhya Pradesh’s Gwalior pic.twitter.com/p8mW36qL0s
— ANI (@ANI) April 2, 2018