कोलकाता : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात कर्नाटकमधील मंगळुरू येथे हिंसाचाराप्रकरणी भाजप राजकारण करत आहेत. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मंगळुरू येथील हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ममता बॅनर्जी स्वतः आंदोलनात उतरल्या असून, केंद्र सरकावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी कर्नाटकात झालेल्या हिंसाचारात काही जणांचा मृत्यू झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत अशा घटना घडल्या नाहीत. केवळ भाजप शासित राज्यात पोलीस गोळीबारात नागरिक मारले जात आहेत, अशी टीका करत सरकार म्हणून जनतेला काही द्यायची इच्छा असल्यास अन्न, वस्त्र आणि निवारा द्या, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी ब्रिटिशांविरोधात अहिंसेच्या मार्गाने लढले. मात्र, आजच्याघडीला आंदोलकांचा आवाज दाबण्याचे काम भाजप करत आहे. आमचे अधिकार डावलले जात असतील, तर त्याविरोधात आम्ही लढणारच, असेही त्या म्हणाल्या.