नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशात हिंसक आंदोलन पेटले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी या प्रकरणात स्वत: हस्तक्षेप करावा आणि हा कायदा मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला सूचना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटलं. या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना नागरिकत्व कायदा आणि देशात सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. या कायद्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे हा कायदा मागे घेण्याचा सरकारला सूचना करण्यात यावी, अशी विनंती राष्ट्रपतींना करण्यात आली आहे, असं समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव यांनी सांगितलं.
देशभरात उसळलेल्या हिंसाचारावर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. आज सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सोनिया गांधी यांनी ही मागणी केली आहे. जमिया प्रकरणी जी कारवाई केली ती चुकीची आहे असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. ईशान्य भारत आणि दिल्ली या ठिकाणची स्थिती चिंताजनक असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.