महत्वाचे…
१. नोव्हेंबर २०१७ मध्ये गुप्तचर यंत्रणेने पटेल यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल दिल्यानंतर सुरक्षा देण्यात आली होती
२. केंद्र सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवली होती
३. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला असून या निर्णयाची माहिती सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली
पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल यांना पुरवण्यात आलेली सुरक्षा केंद्र सरकारने हटवली. गुप्तचर यंत्रणेने हार्दिक पटेल यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल दिल्यानंतर ही सुरक्षा देण्यात आली होती. पटेल यांच्या सुरक्षेवरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.
गुजरातमधील निवडणुकीत भाजपाविरोधात प्रचार करणारे हार्दिक पटेल यांना नोव्हेंबर २०१७ मध्ये केंद्र सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) आठ जवान तैनात करण्यात आले होते. मात्र, ही सुरक्षा आता हटवण्यात आली आहे. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला असून या निर्णयाची माहिती सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
नोव्हेंबर २०१७ मध्ये गुप्तचर यंत्रणेने हार्दिक पटेल यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल दिल्यानंतर ही सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, आता हार्दिक पटेल यांना कोणताही धोका नसल्याचे गृह मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.