पटणा/रांची – चारा घोटाळ्यात देवघर कोषागारातून अवैध रक्कम काढल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव हे कारागृहात आहेत. न्यायालय चारा घोटाळ्याप्ररकरणी उद्या शिक्षा ठोठावणार आहे. सीबीआय न्यायालयात भादंवी कलम ४२० आणि १२० नुसार लालू प्रसाद यादव हे दोषी आढळले आहेत. लालूंना काय शिक्षा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना सीबीआय न्यायालयाने २३ डिसेंबरला दोषी ठरवले आहे. त्यांच्यासह या घोटाळ्यातील १५ आरोपींनाही दोषी ठरवले होते. तर जगन्नाथ मिश्रांसह ७ आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. या दोषी आरोपींना न्यायालय उद्या शिक्षा ठोठावणार आहे.
सीबीआय अधिकाऱ्याच्या माहितीनुसार लालूंना भादंवी कलम ४०९ नुसार १० वर्ष, तर कलम ४६७ नुसार जन्मठेपही होऊ शकते. तर कायदेतज्ज्ञांच्या मतानुसार लालूंना जास्तीत जास्त ७ वर्ष आणि कमीत कमी १ वर्षाची शिक्षा होऊ शकते. १९९० ते १९९४ च्या दरम्यान देवघर कोषागारातून ८९ लाख २७ रुपये अवैधपणे काढल्याचा आरोप लालूंवर आहे. बिहारचे मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाला होता. दरम्यान ९५० कोटींचा चारा घोटाळा असून यात ३८ आरोपींविरोधात सीबीआयने २७ ऑक्टोबर १९९७ ला गुन्हा दाखल केला होता.