नवी दिल्ली : करोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी राज्यात होणाऱ्या क्रीडा स्पर्धा (आयपीएलसह) रद्द करण्यात येत असल्याचे दिल्लीच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे. यासंदर्भातील पत्रक दिल्ली सरकारने जाहीर केले आहे. दिल्ली सरकारच्या या निर्णयाला उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दुजोरा दिला आहे.
आयपीएल स्पर्धा होणार की नाही याबाबत अद्याप बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतलेला नाही. १४ मार्च रोजी आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलची बैठक होणार आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्र सरकारने देखील बीसीसीआयला यंदा स्पर्धा घेऊ नका असा सल्ला दिला आहे. अर्थात केंद्राने प्रेक्षकांशिवाय स्पर्धा घेण्यास हरकत नाही असा पर्याय दिला आहे. यावर बीसीसीआयने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.
बीसीसीआयने आयपीएलच्या १३व्या हंगामासंदर्भात कोणताही निर्णय घेण्याआधी देशातील एका राज्य सरकारने त्यांना झटका दिला आहे. देशाची राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाने आयपीएलच्या स्पर्धा राज्यात होणार नसल्याचे म्हटले आहे. दिल्ली सरकारने आपल्या अधिकारांचा वापर करत १८९७ च्या कायद्यातील नियमांच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील पत्रक दिल्ली सरकारने जाहीर केले आहे.