नवी दिल्ली : भाजप खासदार मनेका गांधी यांनी एन्काउंटरवर बोलताना सांगितले की, हा अत्यंत भयानक प्रकार आहे. पोलीस कायदा हातात घेऊ शकत नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. पोलिसांनी तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेलं असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं आहे. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहीजण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत तर काहीजण विरोध दर्शवत आहेत.
मनेका गांधी यांनी चकमकीवर बोलताना सांगितलं आहे की, “जे झालं आहे ते देशासाठी अत्यंत भयानक आहे. तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. न्यायालयाने त्यांना अशीही फाशीची शिक्षा सुनावली असती. तर तुम्ही न्यायलयीन प्रक्रिया सुरु होण्याआधीच गोळी चालवणार असाल, तर मग न्यायालय, कायदा आणि पोलीस असण्याचा अर्थ काय?”. असा सवालही मनेका गांधी यांनी उपस्थित केला आहे.