लखनऊ : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला मदत केली आहे. मात्र, हे सुरु असताना मुस्लिम समाजाचे प्रतिनिधीत्व करणा-या जमियत उलेमा-ए-हिंद ने स्पष्ट केले की शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोणतेही पत्र लिहिले नाही. जमियतने म्हटले की त्यांची संघटना बनावट पत्रासंदर्भात चौकशी करत आहे. लवकरच याबाबत खुलासा करण्यात येईल की हे बनावट पत्र कोणी पाठवले आहे.
या कथित पत्रात म्हटले आहे की काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय हा काँग्रेससाठी हानिकारक असणार आहे. जमियतचे प्रेस सचिव फजलूर रेहमान यांनी एका न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले की, त्यांच्या संघटनेने कोणतेही पत्र सोनिया गांधींना लिहिलेले नाही. मीडियामध्ये फिरत असलेले पत्र हे बनावट आहे. त्या पत्राला व्हायरल करण्यात आले. आम्ही त्याची चौकशी करत आहोत. लवकरच आम्ही स्पष्ट करू की हे पत्र नेमके कोणी पाठवले आहे.
अरशद मदनीच्या नावाने लिहिलेल्या पत्रात काय होतं….
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मी तुमचे लक्ष महाराष्ट्रातील खराब राजकारणाकडे वेधू इच्छितो. हे दुर्दैवी आहे की तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार करत आहात. हा निर्णय काँग्रेस पक्षासाठी खतरनाक आणि घातक ठरू शकतो.