नवी दिल्ली : डबघाईस आलेल्या MTNL आणि BSNL या सरकारी टेलिकॉम कंपन्यांचे विलिनिकरणाचा निर्णय सरकारने घेतला. बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहीती पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रसाद म्हणाले की, MTNL किंवा BSNL या सरकारी कंपन्या बंद होणार नाहीत किंवा त्यांच्यातील गुंतवणूकही कमी केली जाणार नाही. कोणत्याही तिसऱ्या कंपनीला यामध्ये सामावून घेतले जाणार नाही. दरम्यान, मंत्रीमंडळाच्या बैठकीत MTNL आणि BSNL या कंपन्यांच्या पुनरुज्जीवन योजनेला तसेच त्यांच्या विलिनिकरणाला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे यापुढे MTNL ही BSNLची सहाय्यक कंपनी म्हणून काम करेल. मात्र, या दोन्ही कंपन्यांच्या विलिनिकरणाच्या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.
स्वेच्छा निवृत्तीचे आकर्षक पॅकेजही जाहीर
सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपन्यांना 4G स्पेक्ट्रमचे वाटप करण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली. दोन्ही कंपन्यांमधील मनुष्यबळ कमी करण्यासाठी स्वेच्छा निवृत्तीचे आकर्षक पॅकेजही जाहीर करण्यात आल्याचीही घोषणा प्रसाद यांनी केली.