नवी दिल्ली : कलम ३७० रद्द झाल्यानतंर सात महिन्यांपासून नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला नजरकैदेत होते. त्यांची आज नजरकैदेतून सुटका झाली. सुटका झाल्यानंतर देशभरात कोरोनाविषाणूमुळे निर्माण झालेल्या अभुतपूर्व परिस्थितीवर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. दरम्यान, “मला आज कळलं आपण जीवन-मरणाचे युद्ध लढतोय. यातून बचावासाठी सर्वांनी केंद्र सरकारचे आदेश पाळायलाच हवेत,” असे आवाहन त्यांनी केलं आहे.
ओमर अब्दुल्ला माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मला आज कळतंय की आपण जीवन-मरणाशी लढा देत आहोत. आमच्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांना सर्वांना सध्या सोडलं आहे. त्यामुळे आता करोनाशी लढण्यासाठी सर्वांनी सरकारचे आदेश पाळायलाच हवेत.”
“ज्या पद्धतीनं जम्मू आणि काश्मीरला २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तोडण्यात आलं. त्यामुळे मुलं महिन्याभरापासून शाळेत जाऊ शकलेली नाहीत. दुकानदारांना उत्पन्न मिळेनास झालं आहे. शिकारा मालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे,” अशा शब्दांत त्यांनी ५ ऑगस्टपासून आजच्या जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवरही माध्यमांशी बोलताना भाष्य केलं.