नवी दिल्ली : पुदुचेरीला केंद्रातील मोदी सरकारकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळत आहे. पुदुचेरी राज्याला सापत्न पणाची वागणूक मिळत आहे. या दुटप्पी वागणुकीपेक्षा मोदी सरकारने पुदुचेरीला तृतियपंथी म्हणून घोषित करावे. अशी मागणी पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी केली आहे.
केंद्रातील मोदी सरकार आमच्यावर अन्याय करीत आहे. आम्हाला कधी केंद्रशासीत प्रदेश म्हणतात, कधी राज्य म्हणून संबोधतात. या दुटप्पी वागणुकीपेक्षा मोदी सरकारने पुदुचेरी राज्याला एकदाचे तृतियपंथी म्हणून घोषित करावे, या शब्दांत नारायणसामी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
केंद्र सरकारच्या धोरणामुळे आम्ही ना इकडचे राहिलो ना तिकडचे राहिलो. ते त्यांच्या मर्जीप्रमाणे आमची राज्य म्हणून तर कधी केंद्र शासीत प्रदेश म्हणून गणना करतात. सध्या आमची स्थिती फार चांगली नाही. पुदुचेरीमधील प्रशासनाला दिल्लीसारखाच त्रास दिला जात आहे.
मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्यावर उपराज्यपाल किरण बेदी यांनी टीका केली आहे. केंद्र सरकार पुदुचेरीच्या गरजा पूर्ण करण्यासाटी पूर्णपणे संवेदनशील आहे, असे किरण बेदी यांनी म्हटले आहे.