नागपूर : अयोध्या ही बुद्धकालीन पुरातन साकेतनगरी असून अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी स्थळावरील जमिनीच्या उत्खननात बौद्धकालीन अवशेष सापडल्याचा दावा राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे माजी सदस्य भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी केला. नागपुरात पत्रकार परिषद घेत त्यांनी हा दावा केला.
वादग्रस्त अयोध्या प्रकरणातील जागेच्या मालकीसंदर्भात अंतिम युक्तीवादाला २३ मार्चपासून सुरूवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भंते सुरई ससाईंच्या विधानामुळे याप्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रामजन्मभूमीच्या ठिकाणी आजही उत्खनन केल्यास बौद्ध संस्कृतीचे अवशेष मिळतील. याठिकाणी याआधीही बुद्धकालीन अवशेष सापडल्याचे अलेक्झांडर कनिंघगॅम, राहुल सांस्कृत्यायन, प्रा. दामोधर कोसंबी, डॉ. रोमिला थापर व डॉ. जगन्नाथ उपाध्याय यांच्या संशोधनातून पुढे आले आहे. या ऐतिहासिक तथ्यांकडे केंद्र व राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाने दुर्लक्ष करू नये अशी विनंती सुरई ससाई यांनी केली आहे.
आस्था व श्रद्धेच्या नावाने संविधानाची पायमल्ली होत आहे. मंदिर-मशिदीला सर्वोच्च न्यायालयाला देखील प्राधान्य द्यावे लागत आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या केस आणि नखांवरती दोनशे फुटांचा स्तूप उभारला होता. याच ठिकाणी महाकवी भदंत अश्वघोष यांचा जन्म झाला, महादानी विशाखा यांनी पुर्वाराम नामक बुद्धविहार उभारला होता. पुढे याच प्राचीन अवशेषांवर प्रथम मंदीर आणि नंतर मशिद उभारण्य़ात आली. मात्र याठिकाणच्या बौद्ध विहारांचा उल्लेखही कुठे केला जात नाही अशी खंत आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी व्यक्त केली.