नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसवर केलेल्या आरोपांना चक्क पाकिस्तानातून उत्तर मिळाले आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस पाकिस्तानसोबत संगनमत करत आहे‘, असा आरोप मोदी यांनी केला होता. या आरोपाला पाकिस्तानने उत्तर दिले आहे. ‘भारताच्या स्थानिक निवडणुकांत पाकिस्तानाला ओढू नका, स्वत:च्या बळावर निवडणुका जिंका’, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
काँग्रेस आणि पाकच्या काही अधिकाऱ्यांमध्ये ३ तास गुप्त बैठक झाली होती, असा आरोप मोदी यांनी केला होता. याचा धागा पकडून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी डॉ. मोहम्मद फैसल यांनी ट्विट केले आहे, की ‘भारताच्या स्थानिक निवडणुकांत पाकिस्तानाला ओढू नाका, बेजबाबदार आणि आधारहीन असलेले बनावट षड्यंत्र करण्यापेक्षा स्वत:च्या बळावर निवडणुका जिंका’.
India should stop dragging Pakistan into its electoral debate and win victories on own strength rather than fabricated conspiracies, which are utterly baseless and irresponsible.
— Dr Mohammad Faisal (@ForeignOfficePk) December 11, 2017
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरी तीन तास बैठक झाली होती. या बैठकीला पाकिस्तानचे उच्चायुक्तांसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची उपस्थिती होती, असा आरोप मोदी यांनी रविवारी केला होता. मोदींच्या विधानांवर काँग्रेसनेही हल्लाबोल केला आहे. कोणतेही पुरावे नसताना मोदींचे आरोप चुकीचे आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.