नवी दिल्ली : एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी आपण १५ कोटी १०० कोटींवर भारी पडू, अशी दर्पोक्ती केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही त्यांचा समाचार घेतला. त्यांच्यामागे १५ जण आले, तरी मी सत्कार करेन, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
‘कोण वारिस पठाण? त्यांना विनाकारण महत्त्व दिलं जात आहे. १५ कोटी सोडा, त्यांच्यामागे १५ जण येऊ द्या, तरीही मी त्यांचा सत्कार करेन’ असा टोमणा संजय राऊत यांनी वारिस पठाण यांना लगावला. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
काय म्हणाले वारीस पठाण…
कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात केलेल्या वक्तव्याने वादाला तोंड फुटलं आहे. “आमच्या वाणीच्या आतषबाजीशी ते स्पर्धा करु शकत नाहीत, लक्षात ठेवा माझं वक्तव्य. विटेला दगडाने उत्तर देणं आता आम्ही शिकलो आहोत. मात्र आपल्याला एकत्र येऊन राहिलं पाहिजे. स्वातंत्र्य मिळायलाच हवं, जी गोष्ट मागून मिळत नाही, ती हिसकावून घ्या. आता वेळ आली आहे. मला म्हणतात आई-बहिणींना पुढे पाठवलं. अरे भाई, आता तर फक्त वाघिणी बाहेर पडल्या आहेत, आणि तुम्हाला घाम फुटला. आता आम्ही सगळे एकत्र आलो, तर काय होईल समजून जा. १५ कोटी आहोत, मात्र १०० वर भारी पडू, लक्षात ठेवा ही गोष्ट’” असं वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं होतं.