मुंबई l स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांना सर्वोच्च न्यायालयाने कारण दाखवा नोटीस बजावली आहे. न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी कुणाल कामरा व रचिता तनेजा यांच्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही नोटीस बजावली आहे.
कुणाल कामरानं अर्णब गोस्वामींना जामीन दिल्यानंतर एक ट्विट केलं. त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. तर रचिता तनेजानं काढलेल्या व्यंगचित्रातून न्यायालयाचा अवमान झाल्याचं सांगत अवमान खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. दोघांविरुद्ध अवमान खटला चालवण्यास अॅटर्नी जनरल के. वेणुगोपाल यांनी परवानगी दिली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोघांनाही सहा आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण?
वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्यावर टीका करणार ट्विट केलं होतं. अर्णब गोस्वामीच्या जामीनाला विरोध करत कामराने सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांविषयी एक वादग्रस्त ट्विट कामरानं केलं होतं.
या दोन्ही प्रकरणात कुणाल कामरावर अवमान खटला चालविण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्याला महान्यायवादी (अॅटर्नी जनरल) के. वेणुगोपाल यांनी परवानगी दिली होती. तर रचिता तनेज यांनी काढलेल्या व्यंगचित्रावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यांच्या विरुद्धही अवमानना याचिका दाखल करण्यात आलेली आहे.