नवी दिल्ली: भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केलेली असतानाच शिवसेनेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी लोकसभेत केली आहे. शिवसेनेने याआधीच सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून वेळोवेळी मागणी केलेली असतानाच शिवसेनेने ही मागणीकरुन केंद्र सरकारसमोर पेच निर्माण केली आहे.
भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज लोकसभेत सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यापाठोपाठ शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी आज लोकसभेत लावून धरली. आपल्या विपुल साहित्यातून दलितांच्या उत्थानासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना, भारत सरकारचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. लोकशाहिरांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्याच्या मागणीसाठी काही महिन्यांपूर्वी खासदार शेवाळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले होते. मंगळवारी खासदार शेवाळे यांनी या मागणीचा पुनरुच्चार लोकसभेत केला.