श्रीनगर: ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री श्री रविशंकर यांच्या ‘पैगाम-ए-मोहब्बत’ या कार्यक्रमात श्रोत्यांनी काश्मीर आझादीच्या घोषणा दिल्या. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून रविशंकर यांना भाषण अर्ध्यावर सोडून परतावे लागले.
श्री श्री यांनी बाबरी मशीद प्रकरणात हस्तक्षेप करुन न्यायालयाचा अपमान करण्यात आला असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. तसेच अयोध्या प्रकरणी त्यांनी भारताचा सिरीया होईल असा धमकीवजा इशारा दिल्याने त्यांच्या विरोधात एमआयएमच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दिली.अशा वेळी बहुविवादित काश्मीर प्रश्नावर अखेरचा तोडगा काढण्यासाठी जम्मू-काश्मीर समन्वय समितीने ‘पैगाम-ए-मोहब्बत’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना समितीने निमंत्रित केले होते. रविशंकर भाषणासाठी उभे राहताच श्रोत्यांमधून नारेबाजीस सुरूवात झाली. यावेळी काश्मीर आझादीच्या घोषणा देण्यात आल्या. आयोजकांनी हस्तक्षेप करून देखील गोंधळ कायम राहिल्याने अखेर रविशंकर यांना व्यासपीठ सोडावे लागले.
कार्यक्रमच वादाचा भोवऱ्यात :
‘पैगाम-ए-मोहब्बत’ हा कार्यक्रमच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. संयोजकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी कर्जमाफी तसेच शिलाई मशीनचे वाटपाचे आमिष दाखविण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यामुळे कार्यक्रमाला काश्मीरच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक हजर होते.