नवी दिल्ली : लोकसभेत बारा तासांच्या वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले आहे. हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी या दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवला असून, ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात आंदोलने तीव्र झाली आहेत.
नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेत बहुमताने मंजुर झाल्यानंतर आसाममध्ये विद्यार्थ्यांकडून हिंसक निदर्शने केली जात आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून या विधेयकाला विरोध केला जात आहे.
नॉर्थ-ईस्ट स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (एनईएसओ) आणि ऑल आसाम स्टुडंट्स युनिअनच्या (एएएसयु) कार्यकर्त्यांनी हे विधेयक लोकसभेत मंजुर झाल्याबद्दल आसाममध्ये १२ तासांचा बंद पुकारला आहे. त्यामुळे राजधानी गुवाहाटीमध्ये सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच दुब्रुगड येथे रस्त्यावर टायर जाळून एएएसयूचे कार्यकर्ते निदर्शने करीत आहेत. तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरुन निदर्शने करीत आहेत.