दिल्ली : महाराष्ट्रतील राजकीय घडामोडींचे पडसाद दिल्लीत उमटले. आज सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसदेच्या आवारात सरकारविरोधी निषेध मोर्चा काढण्यात आला. सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी हातात फलक घेऊन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.
‘अबकी बार बेईमानो की सरकार’, ‘लोकशाहीची हत्या करणे बंद करा’ अशा घोषणा देखील देण्यात आल्या. केंद्र सरकारला धारेवर धरण्यात आले. विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेत घोषणाबाजी करत केंद्र सरकारवर लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप केला. दुपारपर्यंत लोकसभेचे कामकाज स्थिगित करण्यात आले. यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हटले की, मी संसदेत एक प्रश्न विचारू इच्छित होतो. परंतु, आता हा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ उरलेला नाही, कारण महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करण्यात आलेली आहे.
राज्याचा पेच सध्यातरी न्यायालया पोहोचला आहे. मंगळवारी त्यावर निर्णय येणार आहे. त्यामुळे निर्णय काय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.