नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीत अपेक्षित यश मिळवल्यानंतर आता भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रया समोर येत आहे. यावेळी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी देखील ट्यट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
‘गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला आत्ता तरी जाग येणार, जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना…’ अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
Shivsena aatta tari Jamini var yenar pic.twitter.com/WIepcD8OtX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 18, 2017
गुजरात आणि हिमाचल मधे भाजपा पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धव जी ठाकरे आणि शिवसेना ला आत्ता तरी जाग येणार , जमिनी वर येणार, ही देवाला प्रार्थना
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 18, 2017
मुंबई महापालिका निवडणुकीपासून किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर प्रचंड टीका केली आहे. आता गुजरात निवडणुकीच्या निकालानंतरही त्यांनी शिवसेनेलाच टार्गेट केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सध्या गुजरातमध्ये मतमोजणी सुरु असून आतापर्यंत भाजप १०८ जागांवर तर काँग्रेस ७१ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे यंदाही भाजप एकहाती सत्ता मिळवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये शिवसेनेनं ४० हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते. सुरुवातीला शिवसेनेनं उमेदवार देणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर ४० उमेदवार उभे करत भाजपची डोकेदुखी वाढवली होती. पण या सगळ्यावर मात करत भाजपनं गुजरातची सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे.