भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर विराटसेनेने ऐतिहासिक कामगिरीची केली आहे. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि १३७ धावांनी पराभव करत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.
फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी टीच्चून गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकन फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली.
सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात टीम इंडियाने पहिल्या डावात तब्बल 601 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याला उत्तर देताना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने आफ्रिकेच्या संघावर फॉलोऑन लादून दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
भारतीय गोलंदाजांनी आणखी भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात १८९ धावांवरच गुंडाळले. दुसऱ्या डावात त्यांच्या एल्गारनं सर्वाधिक ४८ धावा केल्या. भारताकडून उमेश यादव आणि रवींद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर अश्विननं दोघांना तंबूत धाडले.
या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आणि ही मालिका सहज खिशात घातली.