कॅनबेरा l भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांदरम्यान आज शुक्रवार ४ डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना कॅनबेरामध्ये खेळला जाणार आहे.
याआधी खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने २-१ असा भारताचा पराभव केला होता. त्यामुळे आता ही टी-20 मालिका रंगतदार होणार आहे. आधीच जाहीर केल्याप्रमाणे भारतीय संघ व्यवस्थापनाने टी ट्वेंटीसाठी स्वतंत्र संघ निवडला आहे. जे खेळाडू वन डे खेळले त्यातील काहीजण टी ट्वेंटी खेळणार नाही.
टी-20साठी निवडलेले खेळाडूच खेळणार मालिका
टी-20 मालिका आणि कॅनबेरामध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्याच्या आधी संघ व्यवस्थापनाने हे स्पष्ट केले आहे की ज्या खेळाडूंना टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आले आहे तेच या मालिकेत सहभागी होतील.
याचा अर्थ असा की जलद गोलंदाज शार्दुल ठाकूर, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि सलामीवीर शुभमन गिल या मालिकेत खेळणार नाहीत.
मात्र बॅकअपसाठी संघासोबत हे खेळाडू असतील आणि एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास ते सामन्यात खेळताना दिसू शकतील. या तिन्ही खेळाडूंना एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आले होते.
भारताची ऑस्ट्रेलियाविरोधातली टी-20 कामगिरी उत्तम
ऑस्ट्रेलियाविरोधातील शेवटचा एकदिवसीय सामना जिंकलेल्या भारतीय संघाकडे आपली विजयी घोडदौड सुरू ठेवण्याची संधी आहे.
तसेच विराटसेनेचा आत्मविश्वास यासाठीही वाढलेला आहे की भारताची ऑस्ट्रेलियाविरोधातली टी ट्वेंटी या प्रकारातील कामगिरी चांगली राहिलेली आहे.
भारताने आजपर्यंत ऑस्ट्रेलियात ९ टी ट्वेंटी सामने खेळले आहेत ज्यातील ५ टी ट्वेंटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवलेला आहे. आत्तापर्यंत एकाही टी-20 मालिकेत भारताचा ऑस्ट्रेलियात पराभव झालेला नाही.