महत्वाचे…
१.शेतीमालाला हमीभाव मिळावा या आणि अन्य मागण्यांसाठी सिन्हा यांचे सोमवारपासून अकोल्यात आंदोलन २. यशवंत सिन्हांच्या आंदोलनाला विरोधकांचा वाढता पाठिंबा ३. सत्तेत राहून शेतकऱ्यांसाठी सिन्हांनी आंदोलन पुकारल्याने सत्ताधाऱ्यांमध्येच धडकी
अकोला: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिन्हा यांना फोन करुन, त्यांच्याशी बातचीत केली. यापूर्वी मुख्यमंत्री सिन्हा यांच्याशी बोलण्याचे टाळत होत असल्याची माहिती समोर आली होती मात्र सिन्हांना वाढता पाठिंबा बघता मुख्यमंत्र्यांना नमते घ्यावे लागले.
शेतीमालाला हमीभाव मिळावा या आणि अन्य मागण्यांसाठी सिन्हा यांनी सोमवारपासून अकोल्यात आंदोलन सुरु केलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून अकोला पोलीस मैदानात यशवंत सिन्हा आणि शेतकरी ठाण मांडून आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही. भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी यासारखी मंडळीही यशवंत सिन्हांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देणार आहेत.
एकीकडे भाजपचेच ज्येष्ठ नेते सरकारविरोधात रस्त्यावर आले असताना दुसरीकडे विरोधकांनीही यशवंत सिन्हांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे अकोल्यातील आंदोलनाचा वाढता प्रतिसाद सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत.
यशवंत सिन्हा यांनी सरकारकडे एकूण सात मागण्या केल्या होत्या. आंदोलकांच्या सातपैकी सहा मागण्या सककारकडून मान्य करणात आल्या आहेत. मात्र नाफेडने शेतमाल किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक अजूनही ठाम आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालाची नाफेडनं किमान हमीभावानं खरेदी करावी,बोंडअळीग्रस्त कापूस शेतकऱ्यांचं तातडीने सर्वेक्षण करून एकरी ५० हजारांची मदत द्यावी महत्वाच्या मागण्या आहे.