मुंबई : ऑनलाईन कर्जमाफी संपूर्ण फसली आहे. आयटीतील घोटाळे बाहेर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी पदावर बसलेल्या डिजीटल दलाल कौस्तुभ धवसेला कधी हटवणार, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णपणे अपयशी झालेली आहे. अजूनही ७७ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. केवळ हजार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळालेली आहे. या सरकारने शेतकऱ्यांची केलेली ही चेष्टाच असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. आयटी विभागाच्या सचिवांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाते, विदयापीठाचा ऑनलाइनचा प्रयत्न फसतो, ऑनलाईन कर्जमाफी अशा सगळयांमध्ये सरकार फेल ठरले आहे अशीही टीका नवाब मलिक यांनी केली आहे.