मुंबई- घाटकोपरमध्ये नाराज शिवसैनिकांनी लावलेले एक पोस्टर सध्या नागरिकांचे लक्ष वेधुन घेत आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा थेट सवाल या नाराज शिवसैनिकांनी या पोस्टरच्या माध्यमातून विचारला आहे.
बाहेरुन पक्षात आलेल्या लोकांना प्राधान्य दिल्यामुळे शिवसैनिक नाराज असल्याचे उघड दिसत आहे. ईशान्य मुंबईची ‘नवनिर्माण शिवसेना’ असे नाव देत नाराज शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये बॅनरबाजी केली आहे. ईशान्य मुंबईत मनसेतून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना पदे दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. शिवसेनेला निष्ठावंतांची गरज नाही, अशी खंतही या पोस्टरमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.