Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांचं राजकीय चारित्र्य तपासावं लागेल : प्रकाश आंबेडकर

शरद पवारांचं राजकीय चारित्र्य तपासावं लागेल : प्रकाश आंबेडकर

अहमदनगर : केंद्रात आणि राज्यात सध्या भाजपविरोधात समविचारी पक्षांची मोट बांधण्याचा विचार सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. मात्र भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पवारांच्या राजकीय चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

शरद पवारांचं राजकीय चारित्र्य तपासावं लागेल, असा आरोप आंबेडकर यांनी केला. निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपसोबत जाणार नव्हती, मात्र राष्ट्रवादीने पहिला पाठिंबा दिला हे विसरुन चालणार नाही, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. अहमदनगरला ते राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्त माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला नसता तर शिवसेना भाजपाबरोबर गेली नसती, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर राष्ट्रीय राजकारणात राजकीय चारित्र्याला महत्व असल्याचंही त्यांनी म्हटलं. चारित्र्य नसल्यास काहीच साध्य करु शकत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी रामदास आठवले आणि ऐक्यावर बोलताना कोण रामदास आठवले असं विचारत त्यांची अवहेलना केली. आठवले यांना आपण ओळखतच नसल्याचं त्यांनी दाखवलं. तर राजकीय पक्ष जातीचे पक्ष असतील तर देशाचं काय होईल, असा सवाल करत जातीय टोळीतील ऐक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

हिंदू संघटनांत नियंत्रित आणि अनियंत्रित संघटना असून अनियंत्रित संघटनांचा त्रास सवर्ण हिंदूंना होऊ लागल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. या संघटनांत वर्चस्वाची लढाई सुरु झाली असून करणी सेनाही त्यातीलच एक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कोंबिंग ऑपरेशन करावं, अशी मागणी त्यांनी केली.

त्याचबरोबर भीमा कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांचा विचार केला नाही, तर भिडे गुरुजी आणि पीएमओ कार्यालयाचा संबंध उघड करण्याचा इशारा आंबेडकर यांनी दिला. याबाबत आपल्याकडे ऑडिओ, व्हिडीओ आणि कागदोपत्री पुरावे असल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments