लोणी: राज्याच्या प्रत्येक विभागातील पाणी प्रश्नाचा अभ्यास पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा होता. महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून पाणी प्रश्नाचे त्यांनी केलेले चिंतन अतिशय महत्वपुर्ण होते. त्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शक सुचनांचा अंर्तभाव असलेला गोदावरी जलविकास आराखडा शासनाने मंजुर केला आहे. जलव्यवस्थापन करुन पश्चिम वाहीनीचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खो-यात वळवून शेतकरी समृध्द करण्याचे डॉ.विखे पाटील यांचे स्वप्न राज्य सरकार पुर्ण करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
लोकनेते पद्मभूषण डॉ..बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रवरानगर येथील स्मृतीस्थळावर आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात मुख्यमंत्री ना.फडणवीस बोलत होते. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राम शिंदे, आ.शिवाजीराव कर्डीले, आ.भाऊसाहेब कांबळे, आ.बाळासाहेब मुरकुटे, माजी आ.चंद्रशेखर कदम, माजी आ.वेठमुगेकर, ह.भ.प.रामराव महाराज ढोक, ह.भ.प उध्दव महाराज मंडलीक, ह.भ.प कैकाडी महाराज, विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी आधिकारी राजेंद्र विखे पाटील, पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील आदि याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मान्यवरांनी पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळवार पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.