मुंबई – काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपप्रणित एनडीएध्ये दाखल झालेल्या नारायण राणे यांच्या पदरी अजूनही निराशाच आली आहे. जवळपास ३ महिने झाले तरी राणे यांना मंत्रीपदाचे आश्वासन देऊन पदापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा संयम आता तुटत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. म्हणूनच त्यांनी सहनशिलता संपण्याआधीच निर्णय घ्या, असा धमकीवजा इशारा भाजप नेतृत्वाला दिला आहे. शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नारायण राणे यांना भाजप कोट्यातून मंत्री करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा सांगितले. त्यानंतर राणे यांनी मंत्रीपदाचा मुहूर्त स्वत:च जाहीर केला होता. मात्र जाहीर केलेल्या मुहूर्तावर राणे यांचा शपथविधी झालाच नाही. शिवाय विधानपरिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत राणे यांना उमेदवारीही नाकारण्यात आली. त्यामुळे राणे अधिकच अस्वस्थ झाले होते. यानंतर त्यांना संयमाने घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र आक्रमक झालेल्या राणे यांचा संयम आता तुटू लागला आहे. हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.