मुंबई : आज बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचं नेतृत्त्व स्वीकारलं. यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? शिवसेनेचे बेगडी हिंदुत्त्व आहे असा टोलाही शेलार यांनी लगावला.
मुंबईतील हॉटेल ग्रँट हयात येथे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मिळून १६२ आमदारांचे महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावर आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली. ओळख परेड आरोपींची होते आमदारांची नाही असं म्हणत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी हा टोला लगावला आहे.
आत्मबल गमावलेल्या नेत्यांनी एक टुकार प्रयत्न केला गेला असंही त्यांनी म्हटलं आहे. हा जनमताचा अपमान आहे. आज महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असेल यात काहीही शंका नाही असंही आशिष शेलार म्हणाले.
आज १६२ आमदार असल्याचा कांगावा या तीन पक्षांनी जरुर केला. तिथे १४५ तरी आमदार होते का? याचं उत्तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला द्यावं लागेल असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. आत्मबळ गमावलेल्या नेत्यांनी आज आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असंही शेलार यंनी म्हटलं आहे.