पुणे: विधानपरिषदेसाठी भाजपने नारायण राणेंना उमेदवारी दिल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह सर्व विरोधक एकत्र येतील, असे सूचक वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘उद्योग आणि रोजगाराची सद्यःस्थिती’ विषयावरील वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. याआधी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र आले होते. आता विधानपरिषदेसाठी राणेंना उमेदवारी दिल्यास विरोधक एकत्र येतील, असे वक्तव्य त्यांनी केले.
देशाची रोजगार स्थिती चिंताजनक आहे. औद्योगिक क्षेत्रात विभागीय समतोल राखण्यात अपयश येत आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्कील इंडिया अशा कोणत्याही योजनांचा उद्योग वाढीवर परिणाम होताना दिसत नाही. राज्यात एकही नवीन उद्योग आलेला नाही. केवळ करार केले जात आहेत. मोदी सरकार विकासदराचे आकडे फुगवून सांगत आहे. मात्र, सलग सहा तिमाहीत विकासदराची घसरण झाली आहे. जागतिक बँकेचा दाखला देऊन उद्योग-व्यवसायातील सुलभतेमधील क्रमवारी १०० व्या क्रमांकावर आल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. मात्र, हा क्रमाक भूषणावह नाही. नोटाबंदीचा तुघलकी निर्णय लागू झाल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था थंडावली आहे. तब्बल २० लाख रोजगार नष्ट झाले आहेत. त्याचा परिणाम रोजगारनिर्मिती आणि नवीन उद्योग गुंतवणुकीवर झाल्याची टीकाही त्यांनी केली.
राणेंना उमेदवारी दिल्यास सर्व विरोधक एकत्र’- चव्हाण
RELATED ARTICLES