Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी मास्क वापरणे बंधनकारक

कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी मास्क वापरणे बंधनकारक

मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करताना मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिले. मुंबईत कोरोना उपचारासाठीच्या ज्या जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत त्यांची देखभाल दुरूस्ती करावी. जेणेकरून आगामी काळात गरज भासल्यास त्यांचा वापर करता येईल. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेचा पुढचा टप्पा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून राबविण्याचे विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज येथे सांगितले.

कोरोनामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरात घ्यावयाच्या दक्षतेबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त यावेळी  उपस्थित होते. मुंबई महानगरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम यशस्वी राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, जनतेला दिवाळी सुखाची जावी यासाठी आपण सर्वांनी सतर्कता बाळगत जनजागृतीच्या माध्यमातून कोरोनाचा धोका संपला नसल्याची जाणीव करून द्यावी. प्रदुषण कमी झाले नाही तर कोरोनाचे संकट कायम राहील ही बाब नागरिकांना पटवून द्यावी, असे आवाहन त्यांनी  महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केले.

रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांमध्ये मास्क न वापरण्याबाबत बेफिकीरी दाखविली जात आहे. तसे न करता मास्क वापरण्याबाबत मोहिम अधिक तीव्र करावी. कायद्याचा धाक दाखवितानाच जनजागृतीवर अधिक भर देऊन मास्क वापरण्याचे आवाहन करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना उपचारासाठी जी जम्बो सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत त्याची भविष्यात गरज भासू शकते ही बाब लक्षात घेऊन नियोजन करावे. या सेंटर्सची आवश्यक तेथे देखभाल दुरुस्ती करून घ्यावी. औषधांची उपलब्धता ठेवावी. या सेंटर्समधील कर्मचाऱ्यांना सुटी देण्याचे नियोजन करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य शासन टप्प्याटप्प्याने अनलॉक करीत आहे त्यामुळे गर्दी नियंत्रण आवश्यक असून दिवाळी आणि त्यानंतरचे १५ दिवस अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगतानाच ज्यांचा लोकांशी कायमच संपर्क येतो असे विक्रेते, बस चालक, वाहक यांची सातत्याने चाचणी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सांसर्गिक आजारांवरील उपचाराचे ५००० खाटांचे रुग्णालय करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या रुग्णालयाचे काम करताना जनहित लक्षात घेऊन करावे, अशी सूचनाही त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.

पुढील वर्ष पूरमुक्त ठेवायचं नियोजन आताच करावं त्यासाठी नाले रुंदीकरण, खोलीकरण ही कामे हाती घ्यावीत त्याचबरोबर रस्ते तसेच अन्य विकासकामांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा मुंबईत कशाप्रकारे परिणाम झाला याबाबत टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) संस्था अभ्यास करणार असल्याचे महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले. कोरोनाच्या  मोफत चाचण्यांसाठी मुंबईत सध्या २४४ केंद्र सुरू करण्यात आले  असून दररोज २० हजार चाचण्यांचे उद्दिष्ट असल्याचे श्री. चहल यांनी सांगितले. त्याचबरोबर मास्क न वापरण्यांवर कारवाईसाठी अतिरीक्त मनुष्यबळ वाढविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments