नागपूर: या महिन्याच्या सुरूवातीला राज्याच्या किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळ धडकलं होतं. यामध्ये झालेली नुकसान भरपाई आज जाहीर करण्यात आली. मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही भरपाई जाहीर केली आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या बोटींसाठी ९६०० रुपये आणि मच्छीमारांच्या जाळ्यांचं नुकसानासाठी २१०० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
ओखीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे सुरू आहेत. जर ते नीट होत नसतील, तर पुन्हा पंचनामे करू. मी स्वतः त्या त्या ठिकाणी जायला तयार आहे, असं पाटील म्हणाले आहेत. केरळाच्या समुद्रात तयार झालेल्या ओखी चक्रीवादळाचा जवळपास १०० मच्छिमारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यांवर धडकलं होतं. यामुळे पर्यटनाचं आणि मच्छिमारांचं भरपूर नुकसान झालं होतं. याचाच अभ्यास करून आता राज्य सरकारनेही नुकसान भरपाई जाहीर केली आहे. ही भरपाई खालील प्रमाणे आहे.
सरकारकडून मिळणारी भरपाई
बोटीचं नुकसान – ४१०० रु.
पूर्णपणे नष्ट झालेल्या बोटींसाठी – ९६०० रु.
मच्छीमारांच्या जाळ्यांचं नुकसान – २१०० रु.
पूर्णपणे जाळं खराब झालं त्यांच्यासाठी – २६०० रु.
कोरडवाहू शेतीसाठी – ६०००रु. प्रति हेक्टर
बागायती शेतीसाठी : १३,५०० रि. प्रति हेक्टर