महत्वाचे…
१. पुरूष गटासाठीच्या सर्व चाचण्या उतीर्ण करून मगच पोलीस दलात पुन्हा दाखल होता येईल २. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी लिंगबदलाची परवानगी नाकारली ३. ललिता साळवे ही पाच वर्षांपूर्वी बीड पोलीस दलात महिला कॉन्स्टेबल म्हणून झाली भरती
मुंबई : लिंग बदलाच्या मागणीनंतर पोलीस दलातल्या नोकरीवर गदा आल्याने माजलगावच्या महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे हिने आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतरही आपली पोलीस दलातील नोकरी कायम राहावी, अशी मागणी ललिता साळवे हिने मुंबई उच्चन्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.
दरम्यान, ललिलाच्या विनंती अर्जाचा सहाणूभूतीपूर्वक विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याला दिल्यात पण यासंबंधीचे लेखी आश्वासन अद्याप मिळालं नसल्याने ललिता साळवेंनी आज अखेर उच्चन्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार पोलीस महासंचालकांनी ललिता साळवेच्या विनंती अर्जाला दुर्मिळातली दुर्मिळ केस म्हणून तिच्या लिंगबदल शस्त्रक्रियेला परवानगी दिलीतर हा प्रश्न तात्काळ मार्गी लागू शकतो
काय आहे ललिता साळवेचं लिंगबदल प्रकरण ?
मूळची राजगावची ललिचा साळवे ही पाच वर्षांपूर्वी बीड पोलीस दलात महिला कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली. पण तिच्या शरिरात सातत्याने होणाऱ्या हार्मोन्स बदलांमुळे डॉक्टरांनी तिला लिंग बदल शस्त्रक्रियेला सल्ला दिलाय. त्यानुसार तिने रितसर बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याच्या रजेचा अर्ज देखील केला. पण त्यांनी तो अर्ज राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठवला पण तिथे ललिता साळवेची मागणी अजब ठरवून तिला लिंगबदलाची परवानगी नाकारण्यात आली. समजा तिला लिंग बदल करायचाच असेल तर तिला तिची नोकरी गमवावी लागेल, आणि तिला पुन्हा पुरूष गटासाठीच्या सर्व चाचण्या उतीर्ण करून मगच पोलीस दलात पुन्हा दाखल होता येईल, अशी आडमुठी भूमिका पोलीस महासंचालकांनी घेतलीय. त्यामुळे ललिता साळवे हिच्यासमोर हायकोर्टात जाण्यासमोर पर्यायच उरलेला नाही. पण या निमित्ताने राज्याच्या पोलीस प्रशासनाची जुनाट विचारसरणी पुन्हा अधोरेखित झाली.
विशेष म्हणजे या लिंगबदल प्रकरणात ललिताचे कुटुंबीयच तिच्या पाठिशी ठामपणे उभा राहिलंय. पण तिचं स्वतःचंच पोलीस दल मात्र, तिला समजून घ्यायला अजिबात तयार नाही. थोडक्यात आपल्या समाजाचीही मानसिकता सुधारताना दिसत आहे. परंतु प्रशासकीय यंत्रणेची मानसिकता मात्र अजूनही जुनाट पद्धतीचीच असल्याचं दिसते.पण मुळात मुद्दा असा आहे की, एखादी व्यक्ती पोलीस दलात सर्व शारिरिक चाचण्या पास करून दाखल झाली असेल तर परत केवळ लिंग बदल शस्त्रक्रिया केली म्हणून त्या व्यक्तीला परत पुन्हा सर्व चाचण्या देऊन भरती होण्याची आवश्यकता नाही. पण केवळ महिला कोट्याचं कारण पुढे करून पोलीस प्रशासन ललिता साळवेची अडवणूक करत आहे. अशीच समाजभावना तयार होतेय. कारण ललिताने स्त्री म्हणून जगायचं की पुरूष म्हणून, हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे.