मुंबई – समृद्धी महामार्ग प्रकल्पात मोठा घोटाळा झाला आहे. मोठे अधिकारी आणि भाजप नेत्यांनी या प्रकल्पाच्या आजूबाजूला मोठ्या जमिनी घेतल्या आहेत. त्यांना अधिक मोबदला मिळवून देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे काम विनासायास सुरू राहावे यासाठीच मोपलवार यांची पुन्हा त्याच ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवर यांना मुख्यमंत्री पाठिशी घालत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अधिकाऱ्याला ठरवून क्लीन चिट देण्यात आल्याचे म्हणत, मलिक यांनी, गेल्या तीन वर्षात ३०७ सिंचन प्रकल्पांसाठी ३९ हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आघाडी सरकारच्या काळात ५० वर्षात ४६ हजार कोटी रुपये खर्च झाले असताना विरोधकांनी ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. मग आता ३९ हजार कोटी रुपयांची मान्यता देतानाही भ्रष्टाचार झाला का ? याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, असेही मलिक यांनी म्हटले आहे.
या सरकारने ३२ हजार कोटी रुपयांमधील ६० टक्के मदतीची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने ही मान्यता राज्य सरकारला दिली नाही. त्यामुळे सरकारने नाबार्डकडून १२ हजार कोटी रुपये घेतले आहेत.
ट्रिपल तलाकवर सरकारचा घाई-घाईने निर्णय
ट्रिपल तलाकबाबत केंद्र सरकार घाई-घाईने निर्णय घेत आहे. ज्या पीडित व्यक्ती आहेत, त्यांच्याशी याबाबत चर्चा करायला हवी होती. सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाक पद्धतीवर बंदी घातलेली नाही, तर तत्काळ ट्रिपल तलाकवर बंदी घातलेली आहे. याबाबत आमच्या पक्षाचे नेते सभागृहात आमची भूमिका मांडतील. या निर्णयाचा मुस्लीम महिलांना लाभ होणार नाही. केवळ लोकांना दाखवण्यासाठी भाजप सरकारने हे विधेयक आणले आहे, असेही मलिक म्हणाले.