ठाणे : भाजपच्या नगरसेविका वर्षा भानुशाली यांना लाचखोर प्रकरणात ठाणे न्यायालयाने 5 वर्ष कैद आणि 5 लाखाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. भानुशाली या मीरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपच्या नगरसेविका आहेत. या प्रकारामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भाईंदर येथील गाळ्यांच्या उंची वाढवण्यासाठी गाळ्याची मालकीण राधा पारेख यांच्याकडून भाजपच्या नगरसेविका असताना वर्षा भानुशाली यांनी 1 लाख 60 हजार रुपयांची मांगणी केली होती. 6 जून 2014 रोजी ठाणे अँटीकरप्शन ब्युरोंनी 50 हजार लाच घेत असताना त्यांना अटक केली होती. आज न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय.
भ्रष्टाचाराविरुद्ध भाजप मोठी लढाई लढत असताना पक्षाच्या नगरसेविकेलाच शिक्षा झाल्याने राजकीय क्षेत्रातही खळबळ उडालीय. भाईंदर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असतात. त्यात नियमांची राजरोसपणे पायमल्ली होत असते. त्याच्या असंख्य तक्रारी होत असतात. जमीन बळकावणं, सरकारी आणि महापालिकेच्याम मालकीच्या जागेवर इमारती उभारणं, खोटी कागदपत्रं तयार करणं, लवकर परवानगी मिळवणं यासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचं बोललं जातं.
उपनगरांमध्ये प्रचंड प्रमाणात अवैध बांधकाम उभं राहिलंय. बिल्डर स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून हे अशा जागांवर बांधकाम करतात. तर मोकळ्या जागांवर रातो रात झोपडपट्ट्याही उभ्या राहतात. त्यामुळे मुंबई आणि परिसरात झोपड्यांचं साम्राज्य तयार झालंय.