पुणे : शरद पवार यांना आरक्षण जातीनिहाय न देता आर्थिक निकषांवर द्यावे असे विधान करत आपल्याच जुन्या मतावरून घुमजाव का करावं लागलं, असा सवाल भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पवार यांची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीची चर्चा सध्या रंगलेली दिसत आहे. त्यात पवार यांनी मांडलेल्या मतांवर अनेक राजकीय अंदाजही वर्तवले जात आहेत. याच मुलाखतीत पवार यांनी आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे, असे मत मांडले होते. त्यावर भंडारी यांना विचारले असता त्यांनी पवार यांचे हे मत गांभीर्याने घ्यायला हवे असे सांगितले. दोन वर्षांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी याच अर्थाचे विधान केल्यावर मात्र याच पवारांनी थयथयाट केल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे मागील दोन वर्षात इतकं काय घडलं की त्यांना आपल्या मतापासून घुमजाव करावा लागला, असे ते म्हणाले. इतकेच नव्हे तर पवार यांनी मुलाखतीत ओबीसी आरक्षणाबद्दल अवाक्षरही काढले नसण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शिवसेनेच्या स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या निर्णयावर भाष्य करताना आम्ही त्यांना मित्रपक्ष मानतो. त्यामुळे हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय विचारांच्या पक्षांची ताटातूट होऊ नये अशी इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले.