मुंबई: शहरातील हवा प्रदूषणात मागील तीन दिवसांपासून वाढ झाल्याने नाताळच्या सुट्टीत मोकळ्या हवेत फिरण्याचा आनंद लुटू पाहणाऱ्या मुंबईकरांवर बंधने आली आहेत. ‘सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्ट अॅण्ड रिसर्च’ (सफर) मार्फत प्रदूषणाचे प्रमाण मोजण्यासाठी चांगले, समाधानकारक, वाईट, अत्यंत वाईट आणि धोकादायक अशी वर्गवारी करण्यात येते. सफरने नोंदविलेल्या आकडेवारीनुसार शहरातील हवा ‘वाईट’ म्हणावी इतकी प्रदूषित होती. तर बीकेसी, कुलाबा, बोरिवली, अंधेरी, माझगाव, नवी मुंबई या ठरावीक भागातील प्रदूषणाची पातळी ‘अत्यंत वाईट’ होती.
‘सफर’च्या आकडेवारीनुसार २.५ एक्यूआय या प्रदूषित घटकाचे प्रमाण काही भागात खूपच जास्त होते. वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात तर ते ३११ या अतिशय वाईट पातळीपर्यंत पोहोचले होते. तर कुलाब्यामध्ये २३५, अंधेरीत २९४, मालाडमध्ये २३१, नवी मुंबईत २८३, बोरिवलीत २६५ पर्यंत गेले होते. सफर संस्थेच्या मानांकनानुसार हे प्रदूषित घटक शहरवासीयांकरिता धोकादायक आहेत. आठवडाभरापूर्वी नवी मुंबई वगळता सर्व ठिकाणची प्रदूषणाची पातळी समाधानकारक होती. ‘मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबईतील वाऱ्याच्या वेगामध्ये सतत चढ-उतार होत आहेत. शनिवारपासूनच शहरातील वाऱ्यांचा वेग मंदावल्याने प्रदूषित घटक वाहून न जाता वातावरणातच तरंगत राहतात. तसेच तापमानही कमी झाले आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होते. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये वाऱ्याची स्थिती पूर्ववत होईपर्यंत प्रदूषणाची ही पातळी कायम राहील.
हवा प्रदूषणाने त्रास होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मागील काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. हवेतील धूलिकण, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि ओझोन या पाच प्रदूषित घटकांचे प्रमाण वाढल्याने फुप्फुसांच्या विकारात वाढ झाली आहे. प्रदूषित हवेत फिरल्याने लहान मुलांमध्ये दम्याचे आजार बळावतात. त्यामुळे लहानांबरोबरच मोठय़ांनीही या प्रदूषित हवेत फिरणे टाळावे,’ असे बॉम्बे रुग्णालयातील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अमिता नेने यांनी सांगितले.