मुंबई: “महाराष्ट्र व मुंबईतून देशाला सगळ्यात जास्त महसूल मिळतो. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होत आलेला आहे. आकडे अर्थमंत्री देत आहेत. त्यातले किती आकडे खरे आहेत? किती खोटे आहेत? हे सहा महिन्यात कळेल.” अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
” अर्थसंकल्प कोणाचाही असेल पण थापा मारणं बंद केलं पाहिजे. हा अर्थसंकल्प देशाचा आहे की एखाद्या पक्षाचा आहे? पक्षाचं निधीवाटप सुरू आहे का? असा प्रश्न लोकांना पडलाय.” असं देखील यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद करण्यात आलेली असून दोन लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याआधी ही तरतूद ९४ हजार कोटी इतकी होती.
याशिवाय करोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.