औरंगाबाद : कामगारांची वाहतूक करणा-या भरधाव बसने दुचाकीस्वार दाम्पत्याला उडवले. या अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली तर महिलेचा पती गंभीर जखमी झाला. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात ४ मार्च रोजी सकाळी ८. ३० वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीमधील बजाज विहारसमोर घडला.
सविता समाधान सोन्ने(३२,रा. जयभवानी चौक,बजाजनगर)असे मृत महिलेचे नाव आहे. तर समाधान सोन्ने हे जखमी झाले. या विषयी माहिती अशी की, सविता आणि समाधान यांच्या नातेवाईकाच्या विवाह समारंभ असल्याने ते आज सकाळी बजाजनगर येथून औरंगाबाद शहराकडे दुचाकीने येत होते. वाळूज एमआयडीसीमधील बजाज विहार समोर ते असताना मागून आलेल्या कामगारांच्या बसने त्यांना उडवले. या अपघातात सविता बसच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या तर त्यांचा पतीही या घटनेत जखमी झाला. अपघातानंतर त्यांना तात्काळ घाटीत हलविण्यात आले. पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.